शहादा (प्रतिनिधी) : नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन निवासी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना देण्यात आले.
निवेदनात अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्यामागे बुवाबाजी, अंधश्रद्धा, सत्ता आणि लैंगिक शोषण यांचे गंभीर जाळे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. समाजातील भीती, असुरक्षितता व अडचणींचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म, ज्योतिष व दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण होत असल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, तसेच दोषींवर कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
फलज्योतिषाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याचीही मागणी करण्यात आली. पीडित महिलांचे संरक्षण, त्यांची ओळख गोपनीय ठेवणे, कायदेशीर व मानसोपचार मदत उपलब्ध करून देणे तसेच साक्षीदारांना सुरक्षा देणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
याशिवाय आरोपीचे राजकीय व प्रशासकीय संबंध उघड करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच राज्यभर अशा भोंदूगिरीच्या प्रकरणांचा शोध घेऊन गुन्हे नोंदविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असेही निवेदनात नमूद आहे.
या वेळी अस्मिता मोहिते, मिनाक्षी आगळे, रेखा तायडे, राजनंदनी मंगळे, सोनल आगळे, मालती मोहिते, राज्य प्रशिक्षण विभाग कार्यवाह कीर्तीवर्धन तायडे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी, सूर्यकांत आगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







