उदगीर (प्रतिनिधी): जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावात शेळ्या चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने तब्बल १ लाख ४० हजार रुपयांच्या ३० शेळ्या लंपास केल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळसांगवी येथील रहिवासी किशोर रुक्माजी तेलंगे हे शेळीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. मंगळवारी (दि. २४ मार्च २०२६) पहाटे सुमारे ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शेडमधील ३० शेळ्या चोरून नेल्या.
या चोरीतील मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये इतकी असून, ही बाब लक्षात येताच तेलंगे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून वाढवणा बु. पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घेऊन मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.







