वर्धा (प्रतिनिधी): Maharashtra State Electricity Board (एमएसईबी) च्या निष्काळजी कारभारामुळे वर्धा येथील Union Bank of India मुख्य शाखेचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आल्याने ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ही शाखा शहरातील महत्त्वाची असून दररोज शेकडो नागरिक विविध व्यवहारांसाठी येथे येत असतात.
तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अचानक वीज गेल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, पेन्शनधारक तसेच व्यापारी वर्गाला तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाखेचे मुख्य कार्यालय आणि राष्ट्रभाषा विस्तार काउंटर असे दोन स्वतंत्र वीज मीटर आहेत. जानेवारी महिन्यात अनवधानाने विस्तार काउंटरच्या बिलावर ₹25,000 (₹20,000 मुख्य शाखा + ₹5,000 विस्तार काउंटर) इतकी रक्कम भरली गेली होती. त्यामुळे अतिरिक्त ₹20,000 रक्कम जमा असूनही एमएसईबीकडून दोन बिले प्रलंबित दाखविण्यात आली.
दरम्यान, शाखेकडून कालच थकबाकी भरूनही आज कोणतीही पूर्वसूचना न देता वीज तोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेचा वीजपुरवठा खंडित करताना एमएसईबीने कोणतीही संवेदनशीलता दाखवली नाही, अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे बँकिंग सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या असून प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.











