बेल्हे (प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवत्ता सुधार योजना’ अंतर्गत ब्लॉकचेन तंत्रज्ञान विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. शीतल गिरमे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यशाळेत पुणे, अहिल्यानगर, नाशिक विभागातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी तसेच औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
🔐 डिजिटल युगात ब्लॉकचेनचे महत्त्व
डॉ. शीतल गिरमे यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची सखोल माहिती देत त्याचे विविध क्षेत्रांतील उपयोग स्पष्ट केले. विकेंद्रीत रचना, डेटा सुरक्षितता आणि पारदर्शक व्यवहार ही या तंत्रज्ञानाची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले. प्रात्यक्षिकाद्वारे ब्लॉक्सची निर्मिती, व्यवहार नोंदणी आणि साखळी स्वरूपातील जोडणी याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
📊 विविध क्षेत्रांमध्ये वापर
ब्लॉकचेनचा वापर केवळ डिजिटल चलनापुरता मर्यादित नसून बँकिंग, पुरवठा साखळी व्यवस्थापन, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, ई-गव्हर्नन्स आणि मतदान प्रणालीमध्येही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
संस्थेचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी सांगितले की, “ब्लॉकचेनमुळे भविष्यात इंटरनेट आणि डिजिटल व्यवहारांची पद्धत पूर्णपणे बदलण्याची क्षमता आहे.”
या कार्यक्रमाला अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी, प्रा. अमोल खतोडे, प्रा. अमोल भोर, डॉ. चौधरी, प्रा. निलेश नागरे, प्रा. शुभम शेळके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन पोखरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहा शेगर यांनी मानले.










