शहादा, दि. २५ प्रतिनिधी :
महाराष्ट्रात वाढत्या भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि चमत्काराच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आक्रमक झाली असून नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने शहादा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
शहादा येथील तहसीलदार संभाजीराव पाटील यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, दैवी शक्ती, ज्योतिष आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांची आर्थिक, मानसिक व शारीरिक फसवणूक वाढत असून विशेषतः महिलांचे शोषण होत आहे. भोंदू बुवा-बाबांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त करण्यात आली.
📌 प्रमुख मागण्या
- प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ तात्काळ सुरू करावा
- जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार-प्रसार करून शाळा-महाविद्यालयांत जनजागृती कार्यक्रम राबवावेत
- चमत्कार व फलज्योतिषाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत
दरम्यान, नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. अशा प्रवृत्तींमुळे समाजात गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची चिंता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी राज्य सरचिटणीस विनायक सावळे, कार्याध्यक्ष संतोष महाजन, प्रधान सचिव प्रवीण महिरे, श्रीकांत बाविस्कर, रवींद्र पाटील, प्रवीण सावळे, हृदयेश चव्हाण, व्ही. एस. बोड्रे, अनिल माळी, वैशाली पाटील, सविता बोड्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
👉 अंधश्रद्धेविरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्याचा इशारा अंनिसकडून देण्यात आला असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.











