आजरा (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली असून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महागाव कॉर्नर (मेघना कोल्ड्रिंक्स) ते नगरपंचायत कार्यालयापर्यंत सुमारे २४० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. हे काम पुढील दोन ते अडीच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्य बाजारपेठेतील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत गेला होता. ठिकठिकाणी खड्डे पडले होते, तर काही ठिकाणी रस्ता उखडून खडी बाहेर पडली होती. नवीन पाइपलाईन खोदकामामुळे धुळीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे व्यापारी, ग्राहक, वाहनधारक आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने तातडीने कारवाई करत मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. गटारीवर वाढवलेले जाहिरात फलक, पत्रे आणि इतर अडथळे हटवण्यात आले. या मोहिमेत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे अभियंता प्रविण बैले, स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.
सध्या रस्त्यावर खडी टाकणे, डांबरीकरण व रोलिंगची कामे वेगाने सुरू आहेत. काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक दर्गा गल्ली, लिंगायत गल्लीमार्गे महागावकडे वळवण्यात आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात महागाव कॉर्नर ते छत्रपती संभाजी चौक (महामार्ग) दरम्यानचे काम करण्यात येणार आहे. या भागात दिवसभर मोठी वाहतूक असल्याने काम रात्रीच्या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार विलास भादवणकर यांनी दिली.
एकूणच, नियोजनबद्ध पद्धतीने आणि वेगाने सुरू असलेल्या या कामामुळे शहरातील नागरिकांना लवकरच सुटकेचा श्वास मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.










