‘राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद २०२६’ पणजीत उत्साहात; ७५ मान्यवरांचा सन्मान
आजरा (विशेष प्रतिनिधी) : “जीवनात संघर्ष हा असायलाच हवा, कारण संघर्षानंतरच पुढचे आयुष्य उजळून निघते. सामाजिक बांधिलकी जपली, तर जीवनाचा अर्थ वेगळा शोधण्याची गरज उरत नाही,” असे प्रतिपादन अभिनेते अभय खडपकर यांनी केले.
पणजी येथील संस्कृती भवन येथे ‘राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद २०२६’ या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम आर्ट्स टुरिझम अँड फेस्टिव्हल समिती आणि नागेश महारुद्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
खडपकर पुढे म्हणाले, “देव प्रत्येकाला काही ना काही कला देतो, पण त्या कलेला योग्य दिशा देणे ही आपली जबाबदारी आहे. कलाकाराला मिळणारी दाद हेच खरे समाधान असते. आयुष्यातील प्रत्येक काम आनंदाने करा आणि नेहमी आशावादी राहा.” त्यांनी गोव्याशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नातेही व्यक्त केले.
या भव्य सोहळ्यात गोवा आणि महाराष्ट्रातील कला, समाजकार्य, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे ७५ मान्यवरांचा ‘लोक गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला रुदाल्फ फर्नांडिस, डॉ. उल्हास प्रभुदेसाई, प्रमोद कामत, रोहिणी पवार, डॉ. बी. एन. खरात तसेच एकनाथ नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यास कलाकार, साहित्यिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.











