सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथे हे आंदोलन पार पडले.
या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी “आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा”, “आंबा-काजू शेतकरी उपाशी, भोंदू सरकार तुपाशी”, “कृषिमंत्र्यांचे करायचं काय, खाली डोके वर पाय” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. मात्र, यामुळे आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाले. राजू शेट्टी आणि वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी हुंबरठच्या दिशेने पायी मोर्चा काढत पुन्हा महामार्ग रोखला. तब्बल तीन ते साडेतीन किलोमीटर पायी चालत जाऊन आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “आंबा आणि काजू बागायतदारांसाठी आम्ही रस्त्यावर बसलो आहोत. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय येथून उठणार नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात इतर मुद्द्यांवर चर्चा होते, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहोत, आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही कोणाचाही खेळ बिघडवू शकतो. महात्मा गांधी यांनी शिकवलेल्या सविनय कायदेभंगाच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. सरकार आम्हाला उन्हात बसवून शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, “गेल्या दोन महिन्यांपासून देवगड आणि वेंगुर्ला येथील बागायतदार आंदोलन करत आहेत. १२ मार्चच्या मोर्चानंतरही शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पालकमंत्र्यांनी भेट देऊन आश्वासन दिले, मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. अपघाताच्या वेळी रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही, पण आंदोलन दडपण्यासाठी मार्ग बदलला जातो. नुकसान भरपाई मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”
या आंदोलनामुळे महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि अधिवेशन संपण्यापूर्वी आंबा व काजू बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष काका ढोके, विजय नाईक, संजय गावडे, एम. के. गावडे, व्ही. के. सावंत, बाळू मेस्त्री, प्रवीण वरणकर, गणेश गावकर, उत्तम लोके यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा व काजू बागायतदार सहभागी झाले होते.
मात्र, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास येत्या काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.










