अकोला (प्रतिनिधी) : शहरातील वानखडे नगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून तयारी जोरदार सुरू आहे. नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
दि. २६ मार्च ते २ एप्रिल दरम्यान हा सप्ताह पार पडणार असून नगरातील नागरिक मोठ्या आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत आहेत. सप्ताहाच्या निमित्ताने येणाऱ्या महाराजांसह सर्व मंडळींसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताह हा भक्ती, नामस्मरण, कीर्तन, भजन आणि सामाजिक ऐक्य वाढविणारा धार्मिक उपक्रम मानला जातो. या काळात भगवान विठ्ठल, श्रीराम, श्रीकृष्ण, दत्त व इतर देवतांच्या नामस्मरणाने परिसर पवित्र व आनंदमय होतो. नामस्मरणामुळे मानसिक शांती मिळून सदाचाराची प्रेरणा मिळते, असेही भाविकांचे मत आहे.
सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम :
- सकाळी ५ ते ६ : काकडा आरती
- सायंकाळी ५ ते ६ : हरिपाठ
- रात्री ८ ते १० : श्रीमद् भागवत कथा
या सप्ताहात काकडा, भजन, कीर्तन, पालखी, दिंडी, भागवत वाचन, जागरण व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
या वेळी भागवत कथा वाचनासाठी राजेंद्र महाराज वक्टे (ता. जि. अकोला) उपस्थित राहणार असून ते समाजप्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कीर्तनासाठी ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचेही कीर्तन होणार आहे.
कार्यक्रमाची सांगता गुरुवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन आणि दुपारी १२ ते २ महाप्रसादाने होणार आहे.
या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी सैनिक सुभाष म्हैसेने यांच्यासह सर्व सदस्य प्रयत्नशील असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










