इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर तालुक्यातील रूई परिसरात निर्माण झालेल्या गंभीर वीज समस्येबाबत भारतीय जनता पक्षाचे तालुका महामंत्री तानाजी मारकड यांनी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
रूई परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शेतीवर याचा मोठा परिणाम होत असून, वीज नसल्यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी चारा पिके व इतर पिके जळून जात असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे नागरिकांनी तानाजी मारकड यांच्याकडे मांडले.
या पार्श्वभूमीवर तानाजी मारकड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा आणि शेती व जनजीवन सुरळीत व्हावे, यासाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.











