चातारी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ):
उमरखेड तालुक्यातील चातारी गावातील पाण्याच्या टाक्यांची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी टाक्यांवरील लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या दिसत असून बांधकाम जीर्ण व अर्धवट अवस्थेत आहे.
तसेच काही ठिकाणी रेलिंग तुटलेले असून टाक्यांच्या परिसरात झाडझुडपांनी वेढा दिल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून या टाक्यांची कोणतीही देखभाल किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी टाक्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करून सुरक्षित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी केली आहे.








