परभणी / प्रतिनिधी –
मानवत तालुक्यातील मु. लोहारा, पोस्ट मंगरुळ येथील शेतकरी निलावंती रामा रोडगे यांचा सोलार पंप २ मार्चपासून बंद असून त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. “शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन” ही समस्या दर्शवत पंप सुरू होत नसल्याने शेतातील पिकांना पाणी मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
सदर सोलार पंप हा प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत बसविण्यात आला असून तो सीरम (SEERAM) कंपनीमार्फत उभारण्यात आला आहे. मात्र, पंप बंद झाल्यानंतर संबंधित कंपनीकडून वेळेत दुरुस्ती केली जात नसल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. “पंप बसवताना मोठमोठी आश्वासने दिली जातात, पण अडचणीच्या वेळी दुर्लक्ष केले जाते,” असे रोडगे यांनी सांगितले.
या संदर्भात १० मार्च रोजी ऑनलाईन तक्रार नोंदविण्यात आली होती. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी महावितरण कार्यालय, मानवत येथे प्रत्यक्ष जाऊन लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
दरम्यान, सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन सोलार पंप दुरुस्त करून सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.







