पाटणबोरी (प्रतिनिधी) : येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या २०१०-२०११ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कालिका माता मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रमंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचे क्षण अनुभवले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आधुनिक युगात आपण कितीही पुढे गेलो तरी शालेय जीवनातील निरागसता, मैत्री आणि आठवणी यांना पर्याय नाही.
यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ, गप्पा-गोष्टी आणि जुन्या आठवणींची देवाणघेवाण करण्यात आली. त्यामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. सर्व सहभागींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते.
या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम मुम्मडवार, गजानन उपरवार, कुणाल नार्लावार, श्वेता रागेवार, पूजा अडवलवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. “पुन्हा लवकरच भेटू” या आश्वासनासह या अविस्मरणीय स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.










