वाशिम (प्रतिनिधी : भागवत घुगे) : सांगली नंतर हिंगोली व वाशिम जिल्हा हळद उत्पादनात राज्यात अग्रेसर मानला जातो. यंदा जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली असली तरी अतिवृष्टीमुळे कंदसड रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यातच हळद काढणीच्या मजुरीचे दर एकरी १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
रिसोड तालुक्यासह जिल्ह्यात मागील काही वर्षांत हळदीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागील तीन वर्षांपासून समाधानकारक दर मिळाल्याने यंदाही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, काढणीच्या हंगामात मजुरांची तीव्र टंचाई जाणवत आहे.
परजिल्ह्यातील मजुरांवर अवलंबित्व
स्थानिक मजूर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना परजिल्ह्यातील मजुरांना बोलवावे लागत आहे. यासाठी अधिक मजुरी द्यावी लागत असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. एकीकडे मजुरी वाढत असताना दुसरीकडे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अवकाळी पावसाचा फटका
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हळद काढणीची कामे मंदावली आहेत. काढलेली हळद शिजवण्यासाठी ढगाळ वातावरणामुळे अडचणी निर्माण झाल्या असून शिजवणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. पाऊस थांबल्यानंतरच या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
उत्पादनात घट
कंदसड रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा हळदीच्या उत्पादनात घट झाली आहे. सरासरी २५ ते ३० क्विंटल प्रतिएकर उतारा अपेक्षित असताना यंदा तो २० ते २२ क्विंटलपर्यंतच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे.
दरात मंदी; निर्यातीवर परिणाम
सध्या हळदीला १२ ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असला तरी अपेक्षित दर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची नाराजी आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाल्याने बाजारात मंदी निर्माण झाली आहे. यंदा किमान १५ ते १८ हजार रुपये दर मिळण्याची अपेक्षा होती.
शेतकऱ्यांची मागणी
“हळद काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. परराज्यातील मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे. काढणी खर्च प्रचंड वाढला असून हळदीला योग्य भाव मिळावा,” अशी मागणी मोरगव्हाण येथील शेतकरी प्रकाश नामदेव काळे यांनी व्यक्त केली.
एकूणच, वाढलेला खर्च, घटलेले उत्पादन आणि दरातील अनिश्चितता यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.











