सेलू प्रतिनिधी : सेलू तालुक्यात राबविण्यात आलेल्या क्षयरोग नियंत्रण अभियानांतर्गत नवरगाव (पुनर्वसन) ग्रामपंचायतला ‘टीबीमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंचायत समिती सेलू येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.
दि. २४ मार्च २०२६ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे यांच्या हस्ते नवरगाव (पुनर्वसन) ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी चोपडे साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी खेडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वरठी, विस्तार अधिकारी चालाख साहेब यांची उपस्थिती होती.
नवरगाव ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत अधिकारी स्वप्निल पांडुरंग मुजबैले, वैद्यकीय अधिकारी डॉ. आचल ठाकरे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा ढगे, आरोग्य सेविका निशिगंधा घोडखांदे आणि आरोग्य सेवक अमोल ढगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या यशामुळे परिसरातील इतर गावांसाठीही नवरगाव आदर्श ठरत आहे.










