परभणी / प्रतिनिधी :-
मानवत तालुक्यातील रुढी शिवारातील केशवराज जीनिंग येथे काल रात्री सुमारे आठच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच रुढी गावातील ग्रामस्थ, जिनिंगमधील कामगार तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तत्काळ मानवत येथील अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला होता.
अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कापसाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग वेगाने पसरली.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, शॉर्टसर्किट किंवा इतर कारणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
👉 या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.





