सटाणा प्रतिनिधी : यावर्षीच्या संपूर्ण हंगामात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाल कांदा अत्यंत कमी दरात विकावा लागत असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कांदा पिकाला शासनाने तातडीने अनुदान जाहीर करावे, अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि अण्णा जाधव व शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, कांदा उत्पादनासाठी मशागत, रोप लागवड, सिंचन, निंदणी, खते, औषध फवारणी, मजुरी व वाहतूक यांचा विचार करता प्रति क्विंटल साधारण 1200 ते 1500 रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र सध्या बाजारात कांद्याला केवळ 500 ते 1000 रुपयांपर्यंतच दर मिळत असून काही ठिकाणी त्याहूनही कमी दराने विक्री करावी लागत आहे.
नाशिक जिल्ह्यात कांदा हे प्रमुख नगदी पीक असून शेतकऱ्यांच्या जीवनाशी ते थेट जोडलेले आहे. यंदा वाढलेली आवक आणि घटलेली मागणी यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता वाढली असून दरावर आणखी परिणाम झाला आहे.
वाढलेली मजुरी, खत व औषधांच्या किमती तसेच बदलते हवामान यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे. सध्याचा बाजारभाव उत्पादन खर्चही भरून काढू शकत नसल्याने शेतकऱ्यांना थेट आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना उपसभापती हरि अण्णा जाधव म्हणाले की, “शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किमान प्रतिक्विंटल अनुदान तातडीने जाहीर करावे. यामुळे उत्पादन खर्चाचा काही भाग भरून निघेल आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल.”
दरम्यान, शेतकऱ्यांनी शासनाने त्वरित निर्णय घेऊन आर्थिक मदत जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी केली आहे.





