यवतमाळ : भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत हमीभावाने सुरू असलेल्या कापूस खरेदीची मुदत संपत आली असून, अजूनही हजारो शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात युवा नेते Vivaswan Sandeep Dhurve यांनी शेतकरी बांधवांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे कापूस वेचणीला विलंब झाला. सुरुवातीला दुष्काळसदृश स्थिती तर नंतर अतिवृष्टीमुळे उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बाजारात कापसाची आवक उशिरा सुरू झाली.
सध्या ‘सीसीआय’ने १५ मार्चपर्यंत खरेदीची मुदत दिली असली तरी खरेदी केंद्रांवर स्लॉट मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. परिणामी अनेक शेतकरी हमीभावापासून वंचित राहत आहेत. दुसरीकडे, खाजगी व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हमीभावाने खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत आणि मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







