संगमनेर (प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विविध गैरप्रकार सातत्याने घडत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनावर नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समितीत अधिकाऱ्यांसोबत झालेला वाद, वडगाव पान येथे अल्पवयीन मुलीवर झालेला ॲसिड हल्ला, तसेच बेकायदेशीर गोमांस विक्रीसारख्या घटना यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. याशिवाय विविध शासकीय कार्यालयांमध्ये हमरी-तुमरीचे प्रकार घडत असल्याने प्रशासनाचा अंकुश कमी झाल्याचे जाणवत आहे.
राजकीय गटबाजीमुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचेही बोलले जात असून, त्यामुळे प्रशासनाला ठोस कारवाई करणे कठीण होत आहे. परिणामी, तालुक्याच्या विकासाला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महिलांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “संगमनेरमध्ये महिला सुरक्षित आहेत का?” असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. अनेक घटनांनंतरही ठोस व धडक कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
एकेकाळी विकसित तालुका म्हणून ओळख असलेल्या संगमनेरचे नाव बेजबाबदार प्रशासनामुळे खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे तालुक्यात कडक व निर्णायक भूमिका घेणाऱ्या खमक्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.







