माथेरान प्रतिनिधी :
माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेबाबत स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून चालकांनी प्रवाशांना वेठीस धरू नये, अशी मागणी जोर धरत आहे.
दस्तुरी नाका ते माथेरान रेल्वे स्टेशन या सुमारे अडीच किलोमीटर अंतरासाठी प्रति प्रवासी ३५ रुपये दर आकारला जात असून तो जास्त असल्याची भावना व्यक्त होत आहे. तरीही स्वस्त व सोयीची वाहतूक म्हणून प्रवासी ही सेवा वापरत आहेत.
ई-रिक्षांची संख्या सुमारे २० असली तरी प्रत्यक्षात केवळ ७ ते ८ रिक्षाच सुरू असतात, काही दुरुस्तीत तर काही चार्जिंगसाठी उभ्या असल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते.
प्रवाशांच्या अडचणी :
- दस्तुरी नाक्यावर उन्हात रांगेत उभे राहावे लागते
- रेल्वे स्टेशनवर रिक्षांची कमतरता जाणवते
- रिकाम्या रिक्षा येण्यास चालकांची अनिच्छा; दोन्ही बाजूंनी भाड्याची अपेक्षा
याशिवाय शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन मोफत सेवा दिल्याने इतर प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याचेही समोर आले आहे.
स्थानिकांचा संताप :
“ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या सेवेतूनच चालकांची आर्थिक प्रगती झाली, मात्र आता तेच प्रवाशांना योग्य सेवा देत नाहीत”, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
ई-रिक्षा चालकांनी प्रवाशांना वेळेवर आणि प्रामाणिक सेवा द्यावी, तसेच प्रशासनाने याकडे लक्ष घालून योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिक व पर्यटकांकडून केली जात आहे.











