भयभीत कुटुंबाची मानवत पोलिसांकडे तक्रार; सखोल चौकशीची मागणी
मानवत / प्रतिनिधी :
मानवत तालुक्यातील मौजे हामदापुर येथे १८ जानेवारी रोजी घडलेल्या जातीय दंगल प्रकरणानंतर आता नव्या घडामोडींमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांकडून पीडित कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार समोर आली आहे.
सदर दंगल प्रकरणात एकूण ११ जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून, मानवत पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ००२३ अंतर्गत ॲट्रोसिटी कायदा व भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
तक्रारदार विद्याधर संभाजी गायकवाड व पांडुरंग सुभाष कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ते दोघेही बाहेरगावी मुक्कामी होते. दरम्यान, आरोपींच्या वडिलांनी व नातेवाईकांनी गावात चर्चा करत, “आमची माणसं सुटून आल्यावर या दोघांना जिवे मारण्याचे नियोजन आहे,” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंब भयभीत झाले असून, त्यांनी मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपींच्या वडिलांची व नातेवाईकांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित व्यक्तींनी कोणताही घातपाताचा कट रचला आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.








