विडूळ, ता. उमरखेड (दि. २९) :
उमा महेश्वर संस्थानात सुरू असलेल्या विडूळ व्याख्यानमालेतील सहावे पुष्प उत्साहात व मोठ्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रा. सीमा शेटे नवलाखे यांनी “सुजान पालकत्व व बालकांचे भविष्य” या विषयावर अभ्यासपूर्ण व प्रभावी मार्गदर्शन केले.
त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सज्जन माणूस घडविण्याची कोणतीही स्वतंत्र शाळा नसते, तर हे कार्य आई-वडिलांनीच पार पाडायचे असते. त्यामुळे सुजान पालकत्व ही एक सृजनशील प्रक्रिया असून ती जाणीवपूर्वक आत्मसात करणे आवश्यक आहे.
पालकत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना त्यांनी मुलांच्या आवडी-निवडी जपणे, त्यांना चौकटीत न बसवणे, श्रमाचे महत्त्व समजावणे, अपयश स्वीकारण्याची ताकद देणे व मोठ्यांचा आदर करण्याची शिकवण देणे या बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, घरातील ज्येष्ठांनी आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या व्याख्यानास परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी पुसद येथील आदर्श शिक्षक विश्वांभर वानखेडे यांचीही उपस्थिती लाभली. संपूर्ण व्याख्यानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, या व्याख्यानमालेत सातही दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व व्याख्याते यांची वैचारिक मेजवानी आयोजित करण्यात आली असून, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.









