अमरावती, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. वाढता जलस्तर लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून पुढील ४८ तासांत धरणातून पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा प्रकल्पातील पाण्याची पातळी सध्या ४४४.०५ मीटरपर्यंत पोहोचली असून धरणातील जलसाठा सुमारे ६५ ते ७८ टक्क्यांपर्यंत भरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी तसेच आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, संभाव्य पाणी विसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनालाही सतर्क करण्यात आले असून नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
