उमरखेड | ग्रामीण प्रतिनिधी :
उमरखेड तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावरच खोटे गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वसंतराव देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका तसेच अवैध वाहतुकीविरोधात सातत्याने बातम्या प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच दि. १० मार्च २०२६ रोजी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रारही केली होती.
या तक्रारीचा राग मनात धरून उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार अमित देशमुख यांच्यावर आकसापोटी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप पत्रकार बांधवांनी केला आहे. दि. १२ मार्च २०२६ रोजी रात्री पोलीस स्टेशनला बोलावून माहिती विचारत असताना त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण केल्याचे आरोप लावण्यात आले.
संबंधित पत्रकार हा एमपीएससीची तयारी करणारा सुशिक्षित युवक असून, समाजातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवत होता. अशा युवकावर खोटे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
या घटनेमुळे भविष्यात पत्रकारांना अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवण्यास भीती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करून संबंधित पत्रकारावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार बांधवांनी केली आहे.







