धाराशिव | प्रतिनिधी :
धाराशिव येथील अंकुर शिशुगृहात अंजुमन वेल्फेअर सोसायटी व श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलन कार्यक्रम उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभली.
अनाथ चिमुकल्यांसोबत ईदचा आनंद साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि डोळ्यांतील आनंद पाहून उपस्थितांच्या मनाला स्पर्श करणारे क्षण अनुभवायला मिळाले. “सण साजरा करण्यापेक्षा तो वाटण्यात खरा आनंद असतो” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
कार्यक्रमात विविध धर्म व समाजातील नागरिकांनी एकत्र येत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले. कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांनी चिमुकल्यांसोबत वेळ घालवून त्यांना आपुलकीची ऊब दिली. त्यामुळे परिसरात बंधुता, एकता आणि सामाजिक सलोखा दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी अंकुर शिशुगृहाच्या कार्याची माहिती जाणून घेतली. निराधार व परित्यक्त बालकांसाठी संस्था करत असलेल्या कार्याबद्दल माहिती घेताना अनेकजण भावूक झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश दापके, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिग्गज दापके-देशमुख, अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पल्ला, डॉ. आमिर खान, पंकज पडवळ, शशिकांत करंजकर, तोफिक शेख, सरफराज पटेल, वसीम तांबोळी, गजानन पाटील, रिजवान शेख, राजेंद्र कापसे, किरण बहीर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून “एकतेतच ताकद असते” हा संदेश पुन्हा एकदा समाजापुढे ठेवण्यात आला असून, ईद निमित्त साजरा झालेला हा कार्यक्रम माणुसकी, प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उत्सव ठरला.







