📝 आजरा (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षासाठी दिला जाणारा मानाचा ‘सुवर्णपदक’ पुरस्कार कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जी. गुरुप्रसाद यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे.
वन विभागातील उत्कृष्ट कामगिरी, प्रभावी प्रशासन आणि निसर्ग संवर्धनासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल क्षेत्राचे जतन व संवर्धन प्रभावीपणे झाले आहे.
विशेष म्हणजे, वनव्यांवर नियंत्रण मिळविण्यात त्यांनी मोठे यश मिळवले आहे. पूर्वी दरवर्षी १ ते १.५ हजार हेक्टर जंगल क्षेत्राचे नुकसान होत होते; मात्र त्यांच्या नियोजनामुळे हे नुकसान घटून केवळ ४५० हेक्टरपर्यंत आले आहे. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण होऊन जिल्ह्याच्या वनसंपदेतही मोठी भर पडली आहे.
या यशाबद्दल सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, देवर्डेचे उपसरपंच मारुती बुरुड आदी मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
यावेळी मान्यवरांनी सांगितले की, “जी. गुरुप्रसाद यांचे निसर्गावर असलेले प्रेम आणि सखोल ज्ञान यामुळे कोल्हापूरच्या निसर्गसंपदेचे प्रभावी रक्षण झाले आहे. हे सुवर्णपदक त्यांच्या प्रामाणिक कार्याची पावती आहे.”
या यशाबद्दल संपूर्ण वन विभागासह जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.











