आजरा (प्रतिनिधी):
मित्रांमधील साधी थट्टा मस्करी अचानक जीवघेण्या वादात बदलल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात बुधवारी रात्री घडली. किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे दहा वाजता नाईक गल्ली येथील मरकज मस्जिद समोर काही मित्र एकत्र जमले होते. सुरुवातीला सुरू असलेली थट्टा मस्करी काही वेळातच वादात बदलली. हा वाद चिघळत गेल्यानंतर संशयित अरकाम लमतुरे याने चाकूने कैफ खतीब, समी तकिलदार आणि आतिफ हिंग्लजकर यांच्यावर हल्ला केला. इतर दोन संशयितांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात कैफ साजिद खतिब (वय २३) याला छातीवर गंभीर जखम झाली. त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. समी तकिलदार (वय २६) आणि आतिफ हिंग्लजकर (वय १९) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अरकाम महम्मद लमतुरे, अबुसुफियान महम्मद लमतुरे आणि शकील हसनअली खेडेकर या तिघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, मृत युवकाच्या घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर दगडफेक करत दुचाकीची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला असून नाईक गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे.
गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून पुढील तपास सुरू आहे.







