चंदगड (प्रतिनिधी):
दौलत साखर कारखान्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, वारंवार आश्वासने मिळूनही थकीत वेतन न मिळाल्याने संतप्त कामगारांनी आज, २ एप्रिल २०२६ पासून चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. ‘चंदगड तालुका साखर कामगार युनियन (CITU)’ च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाले असून, “आता नाही तर कधीच नाही” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
कामगारांनी प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीतील थकीत वेतन तात्काळ देण्याची प्रमुख मागणी केली आहे. याशिवाय मागील हंगामातील रिटेनिंग अलाउन्स, चालू हंगामातील ओव्हरटाईमचे पैसे, त्रिपक्षीय कराराची पूर्ण अंमलबजावणी, हंगामी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे आणि बेकायदेशीर बदल्या रद्द करण्याच्या मागण्यांचाही समावेश आहे.
कारखाना प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता कामगारांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला असून, मागण्यांची लेखी पूर्तता आणि प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
“आम्ही आमचे रक्त आटवून कारखाना चालवला, पण आज आमच्याच कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने आमचा अंत पाहू नये,” अशी भावना आंदोलक कामगारांनी व्यक्त केली.
या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून तहसील कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासन यांच्याकडून या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण चंदगड तालुक्याचे लक्ष लागले आहे.






