आजरा (प्रतिनिधी):
आजरा नगरपंचायतीच्या मालकीच्या दुकान गाळ्यांच्या भाडेवाढीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असून, या वाढीला अन्यायकारक ठरवत सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांच्याशी सविस्तर चर्चा करत दुकानदारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले.
नगरपंचायतीने केलेली भाडेवाढ जास्त असल्याची तक्रार करत अनेक दुकानदारांनी प्रशासनाकडे आक्षेप नोंदवले होते. यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आता नगराध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत या प्रश्नाला नवे वळण मिळाले आहे.
चर्चेदरम्यान नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांनी स्पष्ट केले की, काही दुकानदारांनी वाढीव भाडे मान्य केले असले तरी ज्यांना ही वाढ मान्य नाही, त्यांच्याशी चर्चा करण्यास प्रशासन तयार आहे. संबंधित दुकानदारांचे प्रतिनिधी म्हणून सुनील शिंदे यांनी चर्चेत सहभागी व्हावे, असा प्रस्तावही त्यांनी मांडला.
या पार्श्वभूमीवर सुनील शिंदे यांनी दुकानदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “प्रशासनाने मला प्रतिनिधी म्हणून बोलावले असले, तरी अंतिम निर्णय दुकानदारांच्या संमतीनेच घेतला जाईल. ज्यांना भाडेवाढ अमान्य आहे, त्यांनी संघटित होऊन आपली भूमिका ठामपणे मांडावी,” असे ते म्हणाले.
आगामी बैठकीत दुकानदारांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, जेणेकरून न्याय्य तोडगा निघू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या भाडेवाढीच्या मुद्द्यावर अमान्य असणारे दुकानदार काय भूमिका घेतात आणि नगरपंचायत प्रशासन कोणता सुवर्णमध्य काढते, याकडे संपूर्ण आजरा शहराचे लक्ष लागले आहे.






