आजरा (प्रतिनिधी) : ‘स्वतःचे घरकुल असावे’ हे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने चालू आर्थिक वर्षात ३५९ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे. संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात संस्थेच्या या उल्लेखनीय प्रगतीची माहिती देत, संस्था आता ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करत असल्याचे सांगितले.
संस्थेच्या आर्थिक कामगिरीनुसार एकूण उलाढाल ३५९ कोटी रुपये इतकी झाली असून, ठेवी १२२ कोटी ८६ लाख, कर्जवाटप ७३ कोटी ७६ लाख, गुंतवणूक ५१ कोटी १३ लाख आणि खेळते भांडवल १५१ कोटी रुपये इतके आहे. तसेच निव्वळ नफा ६४ लाख ५५ हजार रुपये नोंदवण्यात आला आहे.
ही संस्था महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली राज्यातील एकमेव गृहतारण सहकारी संस्था असून तिला ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच सहकार भारती, कोल्हापूर जिल्हा यांच्याकडून ‘उत्कृष्ट संस्था’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गडहिंग्लज आणि कोल्हापूर येथे संस्थेची स्वतःच्या मालकीची कार्यालये कार्यरत आहेत.
संस्थेचे जाळे आता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारले असून आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली व पाटणे फाटा (चंदगड) येथे शाखा सुरू आहेत. सर्व शाखा संगणकीकृत असून RTGS/NEFT, SMS सुविधा, लाईट बिल भरणा केंद्र, गृहकर्ज (१.५० कोटींपर्यंत), प्लॉट खरेदी कर्ज (१ कोटींपर्यंत) तसेच सोनेतारण कर्ज अशा विविध आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
संस्थेच्या या यशामागे व्हा. चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर, संचालक प्राचार्य डॉ. अशोक सादळे, दिनकर पोटे, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. रवींद्र आजगेकर, कृष्णा डेळेकर, युवराज शेटके, प्रो. (डॉ.) तानाजी कावळे, प्रा. नेहा पेडणेकर, प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील, प्रा. क्रांती शिवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच व्यवस्थापक मधुकर खबरे, प्रशासन अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी अरविंद कुंभार आणि सर्व कर्मचारी वर्गाच्या परिश्रमामुळे तसेच सभासद, ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासामुळे संस्थेने हे यश संपादन केल्याचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी नमूद केले आहे.










