शिरूर (प्रतिनिधी) : दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी केंदूर, धमारी व खैरेनगर परिसरात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करण्यात आली.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळशे पाटील, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समितीच्या उपसभापती सौ. सविता पऱ्हाड, उद्योजक प्रमोद पऱ्हाड तसेच विश्वास पऱ्हाड, मदन पऱ्हाड, जगदीश पऱ्हाड यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी बांधवांना धीर दिला.
यावेळी दिलीप वळसे पाटील यांना दूरध्वनीद्वारे परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय स्तरावरून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, लवकरात लवकर मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







