बदनापूर :
शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा बनत असून, नियोजनातील विसंगतीमुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
बाजारातील जागेच्या प्रश्नावरून दिवसभर वादावादीचे वातावरण होते. स्थानिक व्यापाऱ्यांनी पहाटेपासूनच जागा निश्चित करण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामीण व बाहेरील व्यापाऱ्यांसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने नाराजी वाढली.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती बदनापूर यांनी जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट केले की, दि. ०३ एप्रिल २०२६ पासून आठवडी बाजार मार्केट यार्डात भरविण्यात येणार नाही. मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार गट क्रमांक ११० मध्ये बाजार भरविण्याचे सांगण्यात आले असून, मार्केट यार्डात दुकाने लावल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
नगर पंचायत बदनापूरकडूनही नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार बालाजी मंदिर परिसर, बालाजी गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नागोरी यांच्या घरापर्यंत, तसेच गणेशनगर, पवार गल्ली, गणपती गल्ली, माळी गल्ली, ज-हाड गल्ली आणि होळकर चौक परिसरात बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजीपाला व इतर दुकाने या भागात, तर मांस विक्रीसाठी खाटीक मोहल्ल्याच्या मागील परिसर निश्चित करण्यात आला आहे. तसेच जालना–औरंगाबाद महामार्ग व अकोला रोडवर दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मात्र, या निर्णयाविरोधात नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी, नगरपंचायत बदनापूर यांना दिलेल्या निवेदनात नागरिकांनी स्पष्ट केले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, माळी गल्ली, गणपती गल्ली व पवार गल्ली हे पूर्णतः रहिवासी व अरुंद रस्त्यांचे भाग असून येथे बाजार भरविल्यास वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होईल.
निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, बाजारामुळे केरकचरा साचून दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रोगराई वाढू शकते. तसेच गर्दीमुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले आहे की, बाजार अन्यत्र स्थलांतरित न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यास पूर्णतः नगर पंचायत प्रशासन जबाबदार राहील.
एकीकडे प्रशासनाचे आदेश आणि दुसरीकडे नागरिकांचा तीव्र विरोध, यामुळे बदनापूरचा आठवडी बाजार सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, या प्रश्नावर तोडगा काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.







