अक्कलकोट (ता. प्रतिनिधी) :
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाला सध्या खीळ बसल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे हे काम संथगतीने सुरू असून सध्या पूर्णपणे बंद असल्याचा आरोप रिपाइं (आठवले गट) कडून करण्यात आला आहे.
रिपाइं (आठवले गट) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी सोलापूर मंडल रेल्वे प्रबंधक, मध्य रेल्वे सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. भुयारी मार्गाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास रिपाइं (आठवले)च्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, दुधनी रिपाइं मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष महेदिमिंया जिडगे तसेच शहराध्यक्ष गोरखनाथ नोडमधील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










