ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील पोई गावातील शिक्षक-शेतकरी गुरुनाथ सांबरे यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतीमुळे आदर्श निर्माण केला आहे. विविध पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी केवळ उत्पादन वाढवले नाही, तर इतर शेतकऱ्यांनाही नव्या दिशेने प्रेरित केले आहे.
सांबरे यांनी स्ट्रॉबेरी, सुरण, आले, हळद, झेंडू, भाजीपाला व भात यांसारख्या पिकांमध्ये यशस्वी प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या देशांचा शेती अभ्यास दौरा करून तेथील तंत्रज्ञान आपल्या शेतीत प्रभावीपणे वापरले आहे.
यंदा त्यांनी पोई गावात एक एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन व मल्चिंगच्या साहाय्याने सूर्यफुलाची लागवड केली असून हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे. जिल्हा परिषद ठाणे व कल्याण पंचायत समितीच्या शेष फंडांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून त्यांनी ‘पिवळं सोने’ पिकवले आहे. त्यांच्या शेतातील सूर्यफुलांचे आकार व उत्पादन पाहून अनेक शेतकरी, पर्यटक आणि कृषी अधिकारी आकर्षित झाले आहेत.
सांबरे यांच्या मते, सूर्यफूल शेती कमी खर्च, कमी पाणी व कमी मेहनतीत अधिक उत्पन्न देणारी आहे. एकरी सुमारे १५ हजार खर्चात ८ ते ९ क्विंटल उत्पादन मिळते. यापासून लाकडी घाण्यावर तेल काढल्यास सुमारे ३५० लिटर तेल उत्पादन मिळू शकते. सध्या या तेलाला चांगला बाजारभाव मिळत असून एकरी एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
या यशस्वी प्रयोगामुळे ठाणे जिल्ह्यात सूर्यफूल शेतीला नवी दिशा मिळाली असून इतर शेतकऱ्यांनीही या पिकाकडे वळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कृषी विभागाने अधिक अनुदान देऊन तेलबिया उत्पादन वाढीस चालना द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.











