सातारा (वाई) : शहरातील स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी सुरू असलेल्या बंदिस्त गटारांच्या कामांबाबत वाई नगरपरिषदेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या चार ते सहा महिन्यांतच या कामांची झालेली दयनीय अवस्था पाहता नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाई शहरात विविध भागांत बंदिस्त गटारांची कामे सुरू असली तरी त्यांचा दर्जा समाधानकारक नसल्याची तक्रार पुढे येत आहे. कामांमध्ये तांत्रिक निकष पाळले जात आहेत की नाही, याबाबत शंका उपस्थित होत असून, भविष्यात हीच गटारे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या कामांची देखरेख करण्यासाठी नेमलेले अधिकारी योग्य तपासणी न करता अहवाल देत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने कामांमध्ये मनमानी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी “अधिकारी सुस्त आणि ठेकेदार मस्त” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
या निकृष्ट कामांमुळे भविष्यात आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करत नागरिकांनी संबंधित कामांची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.











