पाथरी (प्रतिनिधी) : पाथरी नगर परिषदेचा कारभार सध्या विस्कळीत झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
नगर परिषदेतील मुख्याधिकारी पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असून सध्या अतिरिक्त पदभारावर कामकाज सुरू आहे. यामुळे दैनंदिन प्रशासन, स्वच्छता व पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना हप्ते वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी वाढली आहे.
याशिवाय, नगर परिषदेत अद्याप स्थायी समिती व विषय समित्या गठीत करण्यात आलेल्या नाहीत. समिती निवडीचा कार्यक्रम जाहीर करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासकीय कामात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच सभांचे इतिवृत्त मागूनही उपलब्ध होत नसल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे.
या सर्व बाबींचा विचार करून पाथरी नगर परिषदेसाठी तात्काळ नियमित व सक्षम मुख्याधिकारी नियुक्त करावा तसेच प्रलंबित स्थायी समिती व विषय समित्या गठीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर गटनेते अन्सारी मोहम्मद इब्राहिम, अन्सारी अब्दुल हातेम, राजेश पाटील, मो. कलीम अन्सारी, मो. इब्राहिम अन्सारी, ॲड. मलिक पटेल, रंगनाथ विरकर, मिलिंद आठवे, नईम खान, अन्सारी आसेफोद्दीन व कुरेशी रज्जाक यांच्यासह नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








