आजरा : विशेष प्रतिनिधी
“माझा जन्म कुठे व्हावा हे माझ्या हातात नव्हतं, पण माझं भविष्य घडवणं माझ्याच हातात होतं,” या जिद्दीच्या बळावर संघर्षावर मात करत डॉ. राजेंद्र भारूड यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झेप घेतली आहे. एका छोट्याशा झोपडीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज प्रशासकीय सेवेच्या सर्वोच्च पदांपैकी एकावर पोहोचला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे गावात अत्यंत गरिबीत त्यांचा जन्म झाला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. आईने कुटुंब चालवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अपमान सहन करावे लागले, मात्र त्यांनी हार न मानता शिक्षणालाच आपले शस्त्र बनवले.
जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात करून त्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला. बारावीमध्ये उत्तम यश मिळवत त्यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयाशी संलग्न जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले. एमबीबीएसच्या शिक्षणासोबतच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली आणि यश मिळवत IAS अधिकारी बनले.
नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना त्यांनी कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. दुर्गम भागात ऑक्सिजन प्रकल्प उभारल्यामुळे त्यांना ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळख मिळाली.
आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कार्यशैलीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
“संघर्ष हीच खरी ताकद”
डॉ. भारूड तरुणांना संदेश देताना म्हणतात की, परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे. संघर्ष टाळण्याऐवजी त्याला सामोरे गेल्यासच यश मिळते.
त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे अनेक तरुणांना नवसंजीवनी मिळत असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.








