शहादा, दि. ०३ (प्रतिनिधी):
राज्यातील वृत्तपत्र उद्योगासमोरील वाढते आर्थिक संकट आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर शासकीय जाहिरात दरांमध्ये तात्काळ १५०% वाढ करावी, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे लाक्षणिक आंदोलन सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून शहादा येथेही हे आंदोलन करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०१९ पासून वृत्तपत्र छपाईसाठी लागणाऱ्या कागद, शाई, वीज आणि मनुष्यबळ यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, शासकीय जाहिरात दर अद्याप जुन्याच निकषांवर आधारित असल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांवर आर्थिक ताण वाढला आहे. अनेक वृत्तपत्रांना बंद पडण्याची वेळ येत असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा हा उद्योग संकटात सापडला आहे.
संघटनेने आपल्या निवेदनात काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये महागाई निर्देशांकानुसार जाहिरात दरात १५०% वाढ करणे, शासकीय ई-टेंडर नोटिसेस पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, जाहिरातींचा किमान आकार २०० चौ.से. निश्चित करणे, तसेच जाहिरातींची बिले ३० दिवसांत अदा करणे यांचा समावेश आहे. तसेच १० वर्षे सेवा करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे, पत्रकार पेन्शन योजनेच्या अटी शिथिल करणे आणि सर्व जाहिराती माहिती व जनसंपर्क विभागामार्फतच देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, २५ वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांची प्रलंबित नैसर्गिक दरवाढ तात्काळ लागू करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, उपाध्यक्ष हिरालाल रोकडे, जिल्हा संघटक प्रा. नेत्रदीपक कुवर, तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
“वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा पाया आहे. हा पाया आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला, तर जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होईल. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा,” असे मत जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले.








