बागलाण, दि. (प्रतिनिधी चेतन बागुल) : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने बागलाण तालुक्यातील अनेक गावांना मोठा तडाखा बसला आहे. सलग काही दिवस सुरू असलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पावसास सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते एक तास कोसळलेल्या पावसामुळे खमताणे, मुंजवाड, नवे निरपुर, तिळवण, पिंपळदर आदी गावांना सर्वाधिक फटका बसला, तर काही ठिकाणी किरकोळ पाऊस झाला.
या पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून गहू, मका, कांदा तसेच डाळिंबासह इतर फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. महिनाभरात चार ते पाच वेळा झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कापणीवर आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दरम्यान, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि अण्णा जाधव यांनी शासनाकडे तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. “शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणताही विलंब न करता तातडीने मदत जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.










