श्रीगोंदा, (प्रतिनिधी) : श्री सकल जैन श्रावक संघ, श्रीगोंदा यांच्या वतीने २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक दिन शहरात भक्तिमय वातावरणात व विविध सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळपासूनच जैन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. पहाटे साडेपाच वाजता दैनंदिन प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर साडेसात ते दहा वाजेपर्यंत शहरात भव्य, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध शोभायात्रा काढण्यात आली. सर्व बांधव व भगिनींनी एकसारखा पेहराव परिधान केल्याने शोभायात्रेला विशेष आकर्षण लाभले.
शोभायात्रेदरम्यान समाजबांधवांकडून ठिकठिकाणी पाणी, आईस्क्रीम व शीतपेयांचे वाटप करण्यात आले. रस्त्यावर कुठलाही कचरा न टाकता स्वच्छतेचा आदर्श घालून देत जैन बांधवांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला.
शोभायात्रा जैन स्थानकात पोहोचल्यानंतर भक्तिमय वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री निर्मलजी छाजेड व मनोजजी पटेरिया (बडनेरा, अमरावती) यांनी भगवान महावीरांचा संदेश व त्यांचे जीवनतत्त्वज्ञान भक्तिगीते व प्रवचनांच्या माध्यमातून उपस्थितांपर्यंत पोहोचवले.
या कार्यक्रमास परिक्रमा ग्रुपच्या डॉ. प्रतिभाताई पाचपुते, नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष सौ. अलकाताई अनभुले, गटनेत्या मीराताई शिंदे, नगरसेवक एम. डी. शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सागर गोरे, प्रशांत गोरे, महावीर पटवा, टिळक भोस, आघाव भाऊसाहेब, गोपाळराव मोटे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, सकल जैन संघाचे युवक कार्यकर्ते व सद्भावना मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वडाळी रोडवरील अभयारण्यातील वन्यजीवांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडून सामाजिक उपक्रमही राबवला.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष विजयजी बोरा, विजय मुथा, सुरेंद्र गांधी, गणेश गुगळे, नवनीत मुनोत, संतोष भंडारी, दीपक भंडारी, संदीप कोठारी, सुनील भंडारी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.








