पातूर ग्रामीण (प्रतिनिधी) : पातूर तालुक्यातील दुर्गम भागातील पहाडसिंगी गावात एस.टी. महामंडळाची बसफेरी मागील महिनाभरापासून बंद असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या बंद बससेवेमुळे गावातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून सेवा तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तसेच रुग्णांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात पोहोचण्यात अडचणी येत असून अनेक वेळा दिरंगाई होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शेतकरी व मजुरांनाही कामासाठी प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाकडे मागणी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
“गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या बसफेरीमुळे विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे,” असे ग्रामस्थ सदाशिव चव्हाण यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी एस.टी. महामंडळाने तातडीने बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी केली आहे.







