पातुर (प्रतिनिधी) :
पातुर तालुक्यातील पिंपरडोळी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य श्रामणेर प्रशिक्षण शिबीर, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण तसेच समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात परिसरातील विविध गावांतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
दि. २७ मार्च ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश बौद्ध संस्कृतीचा प्रसार, धम्म चळवळीला चालना देणे आणि समाजातील कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा व प्रेरणा निर्माण करणे हा होता. शिबिरादरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या धम्म परिषदेत मार्गदर्शन करताना भंते राजज्योती यांनी “शांती, करुणा आणि चित्ताची शुद्धता म्हणजेच धम्म” असे प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
शिबिरात आलेगाव, चोंढी, अंबाशी, आसोला, कार्ला, पहाडसिंगी, चरणगाव आदी गावांतील समाजबांधवांनी भंते व श्रामणेर प्रशिक्षणार्थींना भोजनदान करून सहकार्य केले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे, मार्गदर्शक पी.जे. वानखडे, डॉ. भिमराव तायडे, नंदकुमार डोंगरे, राजेश सरकटे, गणेश दंडी, सरपंच दिलीप ताजने, इंदुताई मेश्राम, ज्योतीताई उंटे, प्रज्ञाताई इंगळे, सिंधुताई शेगावकर आदींनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
तसेच पिंपरडोळी येथील तथागत बौद्ध उपासक सेवा समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.








