चाकूर | प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील तिवटघाळ येथील घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाचे बिल मिळत नसल्याने तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तब्बल दहा महिने उलटूनही बिल न मिळाल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लाभार्थ्यांनी बिलासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करूनही पाच महिन्यांपासून कोणतीही रक्कम मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना कर्ज, मजुरी व इतर खर्च भागवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, घरकुलाच्या बिलासाठी संबंधित अभियंत्याकडून वारंवार पैशांची मागणी केली जात आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच लाभार्थ्यांना तात्काळ बिलाची रक्कम मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून दखल न घेतल्यास सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ पासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या उपोषणात श्री. धोंडीराम त्रंबक मुट्ठे, नामदेव रामराव बिराजदार यांच्यासह गावातील इतर नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.








