आजरा (प्रतिनिधी) : पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देत ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी नूतन लोकप्रतिनिधींनी जोमाने कार्य करावे, असे आवाहन सरपंच परिषद च्या वतीने करण्यात आले. आजरा पंचायत समितीच्या सभागृहात सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी नूतन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये जि.प. सदस्य सुधीर राजाराम देसाई, शिरीष हिंदूराव देसाई, पंचायत समिती सभापती जयश्री गजानन गाडे, उपसभापती यशोदा युवराज पोवार, सदस्य समीर दशरथ पारदे, विकास वसंत चोथे तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्या शारदा शिवानंद गुरव यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे आता नव्या सदस्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे.” त्यांनी अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषदेची स्थापना झाल्याचा उल्लेखही केला.
यावेळी सरपंच परिषदेने आपल्या २१ प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये सरपंच व उपसरपंचांना सन्मानजनक मानधन, एस.टी. प्रवास मोफत सुविधा, जिल्हा नियोजन मंडळात प्रतिनिधित्व, तसेच ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली.
प्रदेश सरचिटणीस राजू प. पोतणीस यांनी सर्वपक्षीय नूतन सदस्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा उपक्रम विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुकाध्यक्ष पांडुरंग तोरसले यांनी स्वागत केले, तर आभार प्रदर्शन नितीन सावंत यांनी मानले.
या सोहळ्यास तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








