आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील ऐतिहासिक व कृषीदृष्ट्या महत्त्वपूर्ण ‘नारायण बाग’ वाचवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी या जमिनीचे संपादन करण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील अर्जुन शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी सुमारे ६.९९ हेक्टर सरकारी जमीन निश्चित करण्यात आली आहे. मात्र, हीच जमीन ‘नारायण बाग’ म्हणून ओळखली जात असून येथे अनेक वर्षांपासून कृषी चिकित्सालय (फळरोपवाटिका) कार्यरत आहे. या ठिकाणी वेंगुर्ला-४ जातीचे काजू, शिसम, करंज, बकुळा, आवळा, हिरडा यांसारख्या मौल्यवान वृक्षांचे संवर्धन केले जाते. तसेच पॉलीहाऊस आणि आधुनिक शेततळी यांसारख्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.
शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “नारायण बाग ही आजऱ्याची ओळख असून स्थानिकांच्या भावना या ठिकाणाशी जोडलेल्या आहेत. औद्योगिक विकास आवश्यक असला, तरी पर्यावरणीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणाचा बळी देणे योग्य नाही.” शासनाने २०११ मध्ये घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार, रोपवाटिका किंवा बीज गुणन केंद्राच्या जमिनी इतरत्र हस्तांतरित करू नयेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून स्थानिक स्तरावर या मुद्द्यावर वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
या प्रकरणामुळे विकास आणि पर्यावरण यामधील समतोल राखण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








