उरण (प्रतिनिधी) : जागतिक जल दिनानिमित्त शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने “मूठभर धान्य व घोटभर पाणी” ही संकल्पना राबवत मुक्या पशु-पक्ष्यांसाठी पाणी व खाद्याची व्यवस्था करण्यात आली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्षी व प्राण्यांना पाणी आणि अन्नाची टंचाई भासते. ही बाब लक्षात घेऊन करंजाडे परिसरात विविध ठिकाणी पाण्याची भांडी व धान्य ठेवून पक्षी व प्राण्यांसाठी जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमातून “जसे माणसाला मूलभूत गरजा आहेत, तसेच प्राण्यांनाही आहेत” हा संदेश देण्यात आला.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बारवे, अमर कुसळे, तुषार कदम, योगेश कुलाल, अमर सावंत, रोशन शर्मा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व नागरिकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. निसर्ग व सजीव सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचा संदेशही देण्यात आला.
शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असून, या उपक्रमामुळे उन्हाळ्यात मुक्या जीवांना अन्न व पाणी मिळून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.








