डोंबिवली (प्रतिनिधी) :
डोंबिवली पश्चिम भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्णत्वास येणार आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी डोंबिवली पश्चिमेला स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. स्थानिक आमदार Ravindra Chavan यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १ एप्रिल रोजी यासंदर्भात अधिकृत शासन आदेश निर्गमित केला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून, कार्यासन अधिकारी प्राची पालव यांच्या स्वाक्षरीने आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
सध्या दस्त नोंदणीसाठी डोंबिवली पश्चिमेकडील नागरिकांना पूर्व भागात जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि श्रम दोन्हींचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. या समस्येची दखल घेत आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालयाची मागणी शासनाकडे सातत्याने मांडली होती.
या निर्णयामुळे पश्चिमेकडील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दस्त नोंदणीसाठी रेल्वे लाईन ओलांडून पूर्वेला जाण्याची गरज उरणार नाही. तसेच पूर्वेकडील कार्यालयावरील गर्दी कमी होऊन कामकाजाचा वेग वाढणार आहे. प्रशासकीय पातळीवरही कामाचे योग्य विभाजन होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
“नागरिकांची ही मागणी अनेक वर्षांपासूनची होती. शासनाशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर यश मिळाले असून, लवकरच हे कार्यालय सुरू होईल,” अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.









