ज्ञानदीप परिवार, तळेगाव रोही यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२६ निमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा आणि सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे पार पडणार आहे. वक्तृत्व स्पर्धा ही ८ वी ते १२ वी गटासाठी असून “असे घडले बाबासाहेब”, “संविधान माणसाचा आधार” आणि “सोशल मीडियाचे दुष्परिणाम” या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर करायचे आहे. तसेच ५ वी ते ७ वी गटासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून यात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता चाचणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक प्रश्न आणि सामान्य ज्ञान असे एकूण ५० गुणांचे प्रश्नपत्रिका असेल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची, ज्ञानाची चाचणी घेण्याची आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक ज्ञानदीप परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.









