अहमदपूर (प्रतिनिधी) : किनगाव येथे अपूर्ण रस्ता व पुलाचे काम सुरू असतानाच टोल वसुली सुरू केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आज सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करत टोल नाक्यावर तीव्र संताप व्यक्त केला.
“रस्ता पूर्ण होण्यापूर्वी टोल वसुली कशी सुरू झाली?”, “गावठाण हद्दीत टोलनाका बसवण्यास कोणती परवानगी?”, “स्वतःच्या गावात फिरण्यासाठीही टोल का भरायचा?” अशा विविध प्रश्नांनी नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अपूर्ण रस्त्यावर टोल आकारला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
किनगाव येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली असून परिसरातील अनेक खेड्यांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येत “मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील” असा इशारा दिला.
या आंदोलनात भाजपा जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी भागवत गुट्टे, पंचायत समिती प्रतिनिधी अशोक मुंडे तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष चंद्रप्रकाश हंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी स्पष्ट इशारा देत, “रस्ता व पुलाचे काम पूर्ण करूनच टोल वसुली सुरू करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असे सांगितले.








