सावरगाव (प्रतिनिधी : प्रदीप ताजने) : सावरगाव येथून ७ एप्रिल रोजी शेगावकडे निघालेल्या पायदळ दिंडी सोहळ्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे. “गण गण गणात बोते”च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात दिंडीची वाटचाल उत्साहात सुरू असून सर्वत्र भक्तिरस ओसंडून वाहताना दिसत आहे.
या दिंडीत महिलांचा सहभाग विशेष ठळकपणे दिसून येत आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, फुगड्या खेळत, अभंग गात आणि टाळांच्या तालावर महिलांनी वातावरण भारावून टाकले आहे. काही महिला आपल्या लहानग्यांसह दिंडीत सहभागी होत असून त्यांचा उत्साह, श्रद्धा आणि समर्पण भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
राहेर येथील महाराजांच्या भजनसेवेने दिंडीला अधिक रंगत आली आहे. त्यांच्या भावस्पर्शी भजनांमधून अध्यात्म, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
या दिंडीचे आयोजन महादेव पायगन, मधुकर इंगळे, वामन राठोड, जानू बाबूसिंग राठोड, रमेश राठोड आणि बबन मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच मनोज पाटील, देविदास चोंडकर, वसुदेव पायघन, ज्ञानदेव पायघन, वामन बलक, गजानन पायघन, बाबुसिंग जाधव आदींच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा वाढली.
दिंडीचा संपूर्ण प्रवास शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून मार्गावर पिण्याचे पाणी, अल्पोपहार व विश्रांतीची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. विविध ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून दिंडीचे उत्साहात स्वागतही केले जात आहे.
ही दिंडी धार्मिक परंपरेसोबतच समाजात श्रद्धा, सेवा आणि एकोप्याची भावना दृढ करण्याचे कार्य करत असून संगीता राठोड यांनी विशेष सहकार्य करत दिंडीला भेट देऊन सहभाग नोंदवला.







